"निव्वळ व्यायाम आणि आसन करणे
योग नसून भावनात्मक विचारांचा
समतोल राखून एका अनामिक तत्त्वाशी
स्वतःला जोडणे म्हणजेच योग"
योग हा शब्द 'युज' या संस्कृत धातूपासून बनला असून योग चा खरा अर्थ आत्म्याचे परमात्म शक्तीशी एकरूप होणे. योग ही भारतातील पाच हजार वर्षांपूर्वीची ज्ञानशैली असून या जीवनशैलीचा उपयोग करून आज पर्यंत अनेक महापुरुषांनी आपले जीवन सफल केले याचे अनेक उदाहरण आपल्या भारतात आपल्याला पहायला मिळतात. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की, योग ही एक व्यायाम पद्धती असून त्यामध्ये शरीराकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र योग ही शारीरिक व्यायाम पद्धती नसून आत्मशुद्धीकरण होण्यासाठी एका अनामिक तत्वाशी स्वतःला एकरूप करून आपले जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने भरण्यासाठी केलेली एक विशेष ध्यान पद्धत आहे.
याची पूर्ण माहिती आज पर्यंत न झाल्यामुळे योग बद्दल अनेक गैरसमज समाजात आहेत. अनेक लोकांसाठी योग म्हणजे विशिष्ट प्रकारच्या लोकांनीच करावा असा समज देखील आहे.
योग म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख करून देणारा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये आपण एका विशिष्ट तत्त्वाशी जोडले जातो. ज्याप्रमाणे शारीरिक हालचाल योग्य पद्धतीने होण्यासाठी योग्य प्रकारचे आहार असणे आवश्यक आहे. अगदी त्याच प्रकारे आपले मानसिक स्वास्थ सदृढ राहण्यासाठी त्याला देखील एका विशिष्ट आहाराची गरज असते यालाच योग असे म्हणतात.
योग करत असताना एका ठिकाणी शांतपणे बसून आपल्या मनातील सर्व विचारांना शांत करत ज्याप्रमाणे सूर्याच्या उजेडाने संपूर्ण सृष्टी प्रकाशमान होत असते अशाच प्रकारे एक असे तत्व या जगात अस्तित्वात आहे.
ज्यामुळे सृष्टीचे सर्व चक्र चालतात. त्या अनामिक तत्वाशी स्वतःचे विचार एकरूप करत आपल्यामध्ये देखील प्रचंड शक्ती असून आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी परिपूर्ण होत आहोत,, अशी भावना मनामध्ये जागृत करून संपूर्ण शक्ती आपल्याशी एक रूप झाली असून ही शक्ती आपल्याला देणाऱ्या परमात्मशक्तीला धन्यवाद द्यावे. अशाप्रकारे आपल्या सोयीनुसार जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मन आणि बुद्धीने केलेली ही प्रार्थना म्हणजेच योग आहे. असे केल्यास आपल्यामधील अनेक अशांत करणाऱ्या विचारांवर आपोआप नियंत्रण येत जाते. व्यर्थ विचारांचे नियंत्रण होऊन मनामध्ये सशक्त विचारांची सुरुवात होते जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होत जातो.त्यामुळे आपले स्वतःचे जीवन तर आनंदी,निरोगी,उत्साही आणि सर्व सुखाने परिपूर्ण तर होतेच त्याच बरोबर आपल्या अवतीभोवती देखील एक सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते आणि त्या वातावरणामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती देखील सकारात्मक होत जाते. मग आहे ना असा हा योग आपल्या सर्वांसाठी उपयोगी...!! नक्कीच विचार कराल.
पुनम सुलाने, महाराष्ट्र