तीचे दोन्हीही हात तीने
माझ्या तोंडावरून फिरवले
पण त्या स्पर्शात मला
आगळेपणच जाणवले...
अश्रूभरल्या नयनांनी ती
एकटक माझ्याकडे पाहत होती
माझा हात हातात घेऊन
काहीतरी सांगत होती.
सांगतांना तीचे शब्द
अडखळत होते...
अन् ओठांवर येऊन पुन्हा
माघारी वळत होते.
नेमकं काय होतंय
कोणालाच काही कळत नव्हतं ...
हव्या असलेल्या प्रश्नांची
उत्तरही कोणाला मिळत नव्हती.
सांजवेळ होताच तीचं रूप
अधिकच खुलू लागलं
सकाळपासून सुकलेला चेहराही
आता गुलाबासारखा फुलू लागला...
पुन्हा एकदा शेवटचं डोळे भरून
तीने राघू-मैनेकडे पाहिलं
अन् सौभाग्याचं लेणं लेऊन
अखेरचा श्वास घेत तीने
आपला प्राण देवाच्या चरणी वाहिला...
कु. कविता महाडीक,
रा. बाबतरा, ता. वैजापूर,
जि. औरंगाबाद (संभाजीनगर)